पुणे- कराड मार्गावर उंब्रजवरून काशीळकडे साधारणपणे ५ कि.मी. अंतरावर पाली हे गाव आहे. या गावावरूनच त्याला पालीचा खंडोबा या नावाने ओळखतात.
सदरच्या देवस्थानात दररोज ४ वेळा पूजा अर्चा केली जाते. देवस्थान हेमाडपंथी असून ते सुमारे १ हजार वर्षांपूर्वीचे आहे. मंदिरात नारळ वाढवीत नाहीत. बकरीचा पशुबळी दिला जातो. येथे पौष महिन्यात मृग नक्षत्रावर खंडोबाचे व म्हाळसाचे लग्न लागते, त्याची पौराणिक कथा खालीलप्रमाणे –
ज्यावेळी समुद्र मंथन झाले त्यावेळी श्री भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण करून देवांना व दैत्यांना अमृत व सुरापान यांचे वाटप केले त्यावेळेस मोहिनीचे रूपावर शंकर भाळले, त्यावेळी श्री विष्णूने शंकरास सांगितले की तू ज्यावेळी मार्तंड भैरवाचा अवतार धारण करशील त्यावेळी मी तुझी इच्छा पूर्ण करीन. त्याप्रमाणे श्री भगवान शंकराने पार्वतीच्या शरीरात प्रवेश करून मोहिनीचे रूप धारण केले व ती अतिसुंदर दिसू लागली म्हणून तिचे नाव महालयाशक्ती असे ठेवले, तीच म्हाळसा. तिने तिम्माशेठ वाण्याच्या घरी बालकन्येचे रूप धारण केले व तिचा विवाह सदर वाण्याने मार्तंड भैरवाशी पौष शु. पौर्णिमा या दिवशी करून दिला. म्हाळसा व महाळसाकांत येथूण गुप्त झाले आणि ते शिवलिंगरूपाने प्रकट झाले. त्यावेळी पाली येथील खंडोबास मल्हारी म्हाळसाकांत हे नाव पडले. पालाई गवळण यांच्या भक्तीप्रीत्यर्थ येह्ते देव निर्माण झाला म्हणून पालाई या नावावरून सदर गावास पाल हे नाव पडले.